भटक्या जमातीतील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणणार : बावनकुळे   

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देत विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. आगामी काळात या समाजाच्या कल्याणासोबत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन समर्पित भावनेने काम करेल, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
 
राज्य शासनाच्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेतंर्गत महसूल विभाग व भटके विमुक्त विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने फर्ग्युसन महाविद्यालय येथे आयोजित विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील नागरिकांना दाखले वितरण समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार विजय शिवतारे, बापूसाहेब पठारे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे, कार्याध्यक्ष संजय पुरी आदि उपस्थित होते.
 
बावनकुळे म्हणाले, राज्य शासनाच्या वतीने विमुक्त जाती व जमातीच्या कल्याणासाठी लोकाभिमुख निर्णय घेऊन त्यांच्यासाठी विविध लोक कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन नागरिकांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रशासनाने काम करावे, आजही या जाती जमातीतील नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहांपासून दूर आहेत. त्यामुळे दोन वर्षांत विमुक्त जाती व भटक्या जमातीतील एकही नागरिक समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबर राहणार नाही. त्यांच्या न्याय व हक्कांचे उल्लंघन तसेच त्यांच्यावर अन्याय होणार नाही, या दृष्टीने समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणासाठी प्रशासनाने काम करावे.पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत बांधण्यात येणार्‍या घरकुलांसाठी गायरान जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. 

Related Articles